Headlines

“विश्वासाचं नातं… आणि त्याच नात्याच्या सावलीत लपलेला विश्वासघात!” मलकापूरात हनीट्रॅपची टोळी सक्रिय

मलकापूर:- मलकापूरच्या शांत आणि सभ्य वाटणाऱ्या परिसरामध्ये आज एक भयाण वास्तव उलगडतंय, जे कुणाच्याही कल्पनेपलीकडचं आहे. चेहऱ्यावर निरागसपणा, बोलण्यात नम्रता आणि वागण्यात विश्वासार्हता… पण याच मुखवट्याआड लपलेली आहे एक सुसंघटित टोळी, जी समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींना जाळ्यात ओढून त्यांच्या आयुष्याशी खेळ खेळते आहे. हा केवळ एका महिलेचा नाही, तर संपूर्ण सामाजिक आराखड्याचा घात आहे – जो दिवसेंदिवस वेग घेत आहे. मलकापूर शहरात समाजातील प्रतिष्ठित, सुजाण आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्तींना टार्गेट करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचा एक काळा सापळा गेल्या काही काळापासून सावकाश सक्रिय झाला आहे. ही साखळी इतकी सूक्ष्मपणे काम करत आहे की अनेकांना सुरुवातीला हे फक्त एक नात्याचं चुकलेलं गणित वाटतं. मात्र जेव्हा खरी गंमत उलगडते, तेव्हा तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो.

या सापळ्याचा केंद्रबिंदू – एक महिला. आपल्या खऱ्या ओळखीला झाकून ठेवत ही महिला कधी गरिबीचं, तर कधी एकटेपणाचं भांडवल करत प्रतिष्ठित व्यक्तींच्या घरात शिरकाव करते. ती कधी मोलकरणीच्या नात्याने, तर कधी शिक्षिकेच्या, कर्मचारी किंवा भाडेकरूच्या भूमिकेतून घरात प्रवेश मिळवते. काही महिन्यांत ती त्या घरातील विश्वासू व्यक्ती बनते. आणि मग सुरू होतो तिचा खरा खेळ…
घरातील पुरुष सदस्याशी जवळीक साधली जाते, त्यांच्या भावनांशी खेळत त्यांना आपल्या जाळ्यात अडकवलं जातं. ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध असून, तिचे सहकारी आधीच त्या घरात लपवून कॅमेरे बसवलेले असतात. त्या कॅमेऱ्यांमधून मिळालेले व्हिडीओ मॉर्फ करून त्या व्यक्तीला समाजात अपमानित करण्याची, आत्महत्येचा दोष लावण्याची किंवा खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याची धमकी देऊन ब्लॅकमेलिंग सुरू होते.
काही वेळा या टोळीच्या जाळ्यात अडकलेले पुरुष मानसिकदृष्ट्या कोलमडतात. समाजात आपली प्रतिष्ठा, कुटुंबाची अब्रू वाचवण्यासाठी ते या ब्लॅकमेलिंगला बळी पडतात. आणि जे काही वेळेस धैर्य दाखवून नकार देतात, त्यांच्यावर खोट्या तक्रारी दाखल करण्याचा प्रयत्न केला जातो. ही एक सामाजिक आत्महत्या आहे – जिवंत असूनही मरणासमान अवस्था.
मागील काही महिन्यांपूर्वी हनुमान नगर रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये या महिलेला व तिच्या साथीदारांना रहिवाशांनी हाकलून दिलं होतं. या घटनेमुळे समाजात एक मोठा संदेश गेला, पण हाच त्रास पुन्हा नव्याने शहरात डोकं वर काढतोय.
विशेष म्हणजे या टोळीच्या पाठीमागे शहरातील एका नामवंत राजकीय पक्षाचा स्थानिक अध्यक्ष असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याच्या आशीर्वादानेच या महिलेचे गोरखधंदे चालत असल्याची माहिती समोर येत आहे. ही बाब केवळ समाजातच नव्हे, तर लोकशाही व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
हा हनी ट्रॅप केवळ व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त करत नाही, तर कुटुंब, समाज आणि एकूणच नात्यांवरचा विश्वास मोडून टाकतो. पैसा कमावण्याच्या या गलिच्छ मार्गामुळे जर हा ट्रेंड वाढीस लागला, तर उद्याच्या पिढीला आपली नितीमूल्यं, संस्कार आणि सुरक्षित समाज देणं अशक्य होईल.
या प्रकारावर प्रशासनाने कठोर भूमिका घेणे ही काळाची गरज आहे. समाजातील सुज्ञ नागरिकांनी एकत्र येत अशा प्रकारच्या विघातक प्रवृत्तींचा पर्दाफाश करणे अत्यावश्यक आहे. नाहीतर उद्या आपल्या घरी, आपल्या जवळच्या व्यक्तीवर अशी वेळ येणार नाही, याची काहीही खात्री देता येणार नाही!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!