मलकापूर( दिपक इटणारे ): रविवारी खाजगी डॉक्टर आणि रुग्णालयांच्या निष्काळजी वर्तणुकीमुळे शहरातील आरोग्य यंत्रणा कोलमडल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. काल दि. 12 जानेवारी रोजी झालेल्या दुर्दैवी अपघातात एका रुग्णाला जीव गमवावा लागला. अपघातग्रस्त रुग्णासाठी तातडीच्या उपचारांची नितांत आवश्यकता असताना, खाजगी डॉक्टरांच्या गैरहजेरीमुळे रुग्णाच्या जीवावर बेतले.
शहरातील खाजगी रुग्णालये फक्त व्यवसायिक हितसंबंधांवर लक्ष केंद्रित करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. मलकापूरमध्ये 4 ते 5 अस्तिरोगतज्ञ असूनही, रविवारी कुणीही उपलब्ध नसल्यामुळे जखमी रुग्णाला बुलढाणा येथे नेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, रुग्णाच्या प्रकृतीने वाटेतच साथ सोडली आणि त्याचा मृत्यू झाला.
“डॉक्टर की फक्त व्यवसायिक?”
“रविवारी खाजगी डॉक्टरांनी रुग्णालये बंद ठेवणे म्हणजे रुग्णांच्या जीवाशी खेळणे आहे. वैद्यकीय व्यवसायातील जबाबदारीचे भान हरवत चालल्याचे हे जिवंत उदाहरण आहे,” असे संतप्त नागरिक म्हणत आहेत. या घटनेनंतर शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. “खाजगी डॉक्टर फक्त पैसे मिळणाऱ्या रूग्णांसाठीच तत्पर असतात का? त्यांना माणुसकी आणि कर्तव्याचं भान आहे का?” असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
प्रशासनाचे अपयश की डॉक्टरांचा गर्व?
शहरातील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर तातडीच्या आरोग्य सेवांसाठी रुग्णालये आणि डॉक्टरांची उपस्थिती अनिवार्य आहे. मात्र, खाजगी डॉक्टरांनी व्यवसायिक स्वार्थासाठी रविवारी उपचार उपलब्ध करून न देणे हे अमानुष असल्याची भावना व्यक्त होत आहे.
“डॉक्टरांची ही बेपर्वाई थांबवण्यासाठी कठोर नियम लागू करा”
“शहरातील खाजगी रुग्णालयांवर प्रशासनाने नियंत्रण ठेवावे आणि रविवारी देखील डॉक्टरांच्या उपस्थितीसाठी कायदेशीर बंधन घालावे,” अशी मागणी संतप्त नागरिक करत आहेत. प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने त्वरित पावले उचलली नाहीत, तर या निष्काळजीपणामुळे अनेक निष्पाप जीव गमावले जातील!