खामगाव : – नोकरी न मिळाल्याच्या तणावातून तरुणाने स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना ७ मार्च रोजी घडली. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरी अडगाव येथील रामरतन विनायकराव टिकार (३२) याने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या चुलत भावाला एक संदेश पाठवला होता. त्यात त्याने नोकरी मिळत नसल्यामुळे नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलत असल्याचे सांगितले होते. तसेच “माझी बॉडी विहिरीतून काढून घ्या,” असा उल्लेख त्या संदेशात होता.
चुलत भाऊ सुधीर विश्वासराव टिकार आणि त्यांच्या काकांनी तातडीने शेतातील विहिरीकडे धाव घेतली असता रामरतन यांचा मृतदेह पाण्यात आढळला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १९४ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.