मलकापूर:- “जिथे रस्ते नाहीत, तिथे अपघात टळणार कसे?” – अशी नागरिकांच्या तोंडी असलेली म्हण मलकापूर शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेवर तंतोतंत लागू ठरते. चाळीसबिघा, बिर्लारोड तसेच इतर वॉर्डातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली असून पावसाळ्यामुळे या रस्त्यांवरील खड्ड्यांनी उघडं डोकं वर काढलं आहे. या खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे रस्ता व खड्ड्याचा अंदाज न येता अपघातांच्या घटनाही घडत आहेत.
याच पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी मलकापूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत प्रशासनाला तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. निवेदनाद्वारे त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, जर लवकरात लवकर रस्त्यांवरील खड्डे बुजवून दुरुस्ती करण्यात आली नाही, तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने रस्त्यावरील प्रत्येक खड्ड्यात बेशरमचे झाड लावून त्या झाडांना व खड्ड्यांना नगरपरिषद प्रशासनातील अधिकाऱ्यांची नावे देण्यात येतील.
तसेच निवेदनात म्हटले आहे की, मलकापूर नगरपरिषद हद्दीत येणाऱ्या चाळीसबिघा परिसर, बिर्लारोड व शहरातील अन्य वॉर्डांतील अंतर्गत रस्ते हे अत्यंत वाईट स्थितीत असून त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अगदी थोडक्या पावसातही खड्ड्यांत पाणी साचून रस्ते वाहतुकीस अपुरे व अपघातांना निमंत्रण देणारे ठरत आहेत.
“रस्त्यांची अवस्था इतकी वाईट झाली आहे की, रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते आहेत असा प्रश्न नागरिकांना पडतो आहे,” असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष न दिल्यास जनआंदोलन उभे करण्याचा इशारा अजय टप यांनी दिला आहे. या निवेदनामुळे नगरपरिषद प्रशासनाच्या भूमिकेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, नागरिकांतही तीव्र नाराजीचे वातावरण आहे. महत्त्वाचे म्हणजे, मलकापूर शहरातील अपुऱ्या व अनियमित रस्तादुरुस्तीसंदर्भात गेल्या अनेक वर्षांपासून तक्रारी होत असल्या तरी अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता नागरिकांच्या संयमाचा बांध फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मलकापूर शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था; प्रहार जनशक्ती पक्षाचे अजय टप यांचा प्रशासनाला इशारा
