जळगाव :- जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ मोठी दुर्घटना घडली. पुष्पक एक्सप्रेसच्या चाकांमधून ब्रेक दाबल्यानंतर धुर आणि ठिणग्या निघाल्याने आग लागल्याची अफवा पसरली. घाबरलेल्या प्रवाशांनी रुळांवर उड्या मारल्या. दुर्दैवाने, याच वेळी समोरून येणाऱ्या भरधाव कर्नाटक एक्सप्रेसने अनेक प्रवाशांना उडवलं.
या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला असून ३० ते ४० प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. आवाज, गोंधळ, आणि प्रवाशांच्या किंचाळ्यांनी भयावह परिस्थिती निर्माण झाली होती.
अपघातानंतर प्रशासन आणि बचावपथकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मदतकार्य वेगाने सुरू असल्याची माहिती दिली आहे.
रेल्वेला आग लागल्याच्या अफवेमुळे उड्या मारलेल्या ११ प्रवाशांचा मृत्यू, ३० हून अधिक जखमी.. जळगाव जिल्ह्यात मोठी दुर्घटना!
