मलकापूर( दिपक इटणारे ) आई-वडिलांमधील एक किरकोळ वाद… आणि त्याच क्षणी कोसळलेला क्रोधाचा झटका… यात एका घरातला आधारवडच कोसळला. मलकापूर शहरालगत मुक्ताईनगर भागात एका तरुणाने लोखंडी सळईने आपल्या जन्मदात्याचा निर्घृण खून केल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे.
ही घटना २६ जून २०२५ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. मृतक तुळशीराम मोहन पठ्ठे (वय ४८) हे पत्नी जया पठ्ठे (वय ४५) यांच्यासोबत खावटीच्या वादावरून वाद घालत होते. वाद विकोपाला जाताच दोघांमध्ये हातघाई झाली. त्यांचा मुलगा निलेश (वय २०) हे दृश्य पाहून मधे पडून वडिलांना थांबवण्याचा प्रयत्न करत होता. पण वडिलांचा संताप काही कमी होईना. अखेर मुलगाही नियंत्रण गमावतो आणि… एका क्षणात सर्व काही बदलून जातं. लोखंडी सळई उचलून त्याने आपल्या वडिलांवर वार केला. रक्ताच्या थारोळ्यात तुळशीराम यांचा जागीच मृत्यू झाला… आणि एका घराचं संपूर्ण भविष्य काळोखात बुडालं. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, फिर्यादी सूरज गजानन चौधरी यांच्या तक्रारीवरून जया पठ्ठे व निलेश पठ्ठे यांच्याविरुद्ध कलम 103(1), 3(5) BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासाचे सूत्र पोनि गणेश गिरी यांच्या हाती असून, प्राथमिक कारवाई पीएसआय भामोदकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
एकाच घरात पती-पत्नी आणि मुलगा… पण क्षुल्लक कारणावरून वाढलेला वाद इतका भयंकर वळण घेईल, याची कोणालाही कल्पना नव्हती. मलकापूर शहरात जूनही या दुर्दैवी घटनेची चर्चा सुरू आहे.