उमाळी (ता. मलकापूर) :- कष्टाने उभा केलेला श्रमाचा मका पीक वाऱ्याच्या एका झटक्यात राख झाला… उमाळी येथील वृद्ध शेतकरी जयप्रकाश चतुर्भुज (वय ८० वर्षे) यांच्या शेतात २६ एप्रिल रोजी घडलेल्या दुर्घटनेने शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे. आकाशात जमलेल्या काळ्या ढगांसोबत आलेल्या वाऱ्याच्या झंझावाताने विद्युत तारांमध्ये घर्षण होऊन शॉर्टसर्किट झाले आणि शेतात प्रलय घडला.
जयप्रकाश चतुर्भुज यांनी घाम गाळून उभे केलेले मका पीक काढणीसाठी सोंगवून ठेवले होते. मात्र, वाऱ्याच्या तडाख्याने वीज तारांत झालेल्या घर्षणामुळे एकाच क्षणात आगीने पेट घेतला. काहीच क्षणात तीन ते चार एकरांवरील मक्याचे पीक जळून भस्मसात झाले. ज्येष्ठ वयातही आपल्या पोटच्या कष्टावर जगणाऱ्या शेतकऱ्याच्या डोळ्यांसमोर त्याचे स्वप्न धुरकट झाले. हातातोंडाशी आलेला घास हरविल्याने चतुर्भुज कुटुंब मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे.
या पार्श्वभूमीवर महावितरण विभागाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्याला आर्थिक मदतीचा दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.