चिखली : शेतीच्या जुन्या वादातून पुतण्याने शेतात काकाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून ठार केल्याची घटना आज, 6 जून रोजी सायंकाळी तालुक्यातील धोत्रा भणगोजी येथे घडली. जनार्दन तुकाराम जोशी (वय 55) असे मृतकाचे नाव आहे. तर समाधान उत्तम जोशी (वय 35) असे आरोपीचे नाव आहे. जनार्दन जोशी आणि समाधान जोशी यांच्यात मागील 5 ते 10 वर्षापासून शेतीच्या प्रकरणाचा वाद होता. दोघांचे शेत एकमेकांना लागून आहे. दरम्यान, आज सायंकाळी जनार्दन जोशी शेतात काम करत होते. त्यावेळी लागूनच असलेल्या शेतात पुतण्या समाधान जोशी ट्रॅक्टर चालवत होता. आधीपासूनचा जमिनीचा सुरू असलेला वाद यावेळी टोकाला गेला. पुतण्या समाधान याच्या मनात काकाचा कायमचा काटा काढण्याचा विचार आला. त्याने परिणामाचा कोणताही विचार न करता ट्रॅक्टर काकाच्या शेतीत त्यांच्या अंगावर घातला. जनार्दन जोशी यांच्या अंगावरून हा भरधाव ट्रॅक्टर गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच ठाणेदार सचिन पाटील यांच्यासह अमडापूर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. या प्रकरणी जनार्दन जोशी यांच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी समाधान जोशी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार सचिन पाटील करत आहेत.
शेतीच्या वादातून पुतण्याने काकाला ट्रॅक्टरखाली चिरडले,चिखली तालुक्यातील घटना!
