मलकापूर: नगर सेवा समिती संचालित लिलाधर भोजराज चांडक विद्यालयात दि. 10 जानेवारी रोजी अभिजात मराठी भाषा अभिमान सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. अनिल खर्चे (इंजिनिअरिंग कॉलेज, मलकापूर) होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री शरद देशपांडे सर तसेच, विशेष उपस्थितीत मोहन शर्मा (बुलडाणा जिल्हा लोकसभा समन्वयक), चंद्रकांत शर्मा (शहर महामंत्री, भारतीय जनता पक्ष), आणि विनोद आकोटकर (किसान आघाडी प्रमुख) यांचा सहभाग होता.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. संयोजिका सौ. अर्चनाताई शुक्ला यांनी प्रास्ताविक करताना मराठी भाषेचा अभिजात दर्जा हा महाराष्ट्राच्या साहित्यिक व सांस्कृतिक परंपरेला मिळालेला सर्वोच्च मान असल्याचे नमूद केले.
त्यानंतर श्री शरद देशपांडे सरांनी मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. त्यांनी राज्य व केंद्र सरकारचे आभार मानत सांगितले की, “अभिजात दर्जा मराठी भाषेच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक समृद्धतेची मान्यता आहे.”
ते पुढे म्हणाले, “मराठी ही केवळ एक संवादाची भाषा नसून ती महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी मराठी भाषेला अमूल्य योगदान दिले आहे.”
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. अनिल खर्चे यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे होणारे फायदे विषद केले.
ते म्हणाले, “महाराष्ट्र राज्य 1960 मध्ये स्थापन झाले, परंतु मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याची प्रतीक्षा अखेर 3 ऑक्टोबर 2024 मध्ये संपली. हा सन्मान मराठी भाषेच्या साहित्यिक व सांस्कृतिक संपन्नतेची साक्ष आहे.”
या सोहळ्यादरम्यान, नगरातील चंद्रकांतजी वर्मा यांनी जुन्या नाण्यांची विशेष प्रदर्शनी मांडली होती. विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत नाण्यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीची माहिती घेतली.
कार्यक्रमाचे संचालन कु. आदिती साराग हिने केले, तर प्रा. डॉ. जयंत राजूरकर यांनी आभार प्रदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाची सांगता संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानाने झाली.