मलकापूर :- पुलवामा (जम्मू-काश्मीर) येथे १४ फेब्रुवारी २०१९ रोजी अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात मलकापूरचे सुपुत्र संजयसिंह भिकमसिंह राजपूत शहीद झाले होते. त्यांच्या सन्मानार्थ मलकापूर येथील माता महाकाली परिसरात विवेकानंद आश्रमजवळ स्मृतीस्मारक उभारण्यात आले आहे. परंतु, या स्मारकाभोवती तारेचे कंपाऊंड किंवा संरक्षण भिंत नसल्यामुळे स्मारकाचे पावित्र्य अबाधित राहत नाही, अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.स्मारक परिसरात रात्रीच्या वेळेस दारू पिणारे लोक जमण्याच्या घटना घडतात, तसेच मोकाट जनावरे या परिसरात वावरत असल्याने स्मारकाच्या स्वच्छतेस आणि पावित्र्याला धक्का पोहोचत आहे. त्यामुळे स्मारकाभोवती तारेचे कंपाऊंड, लोखंडी गेट किंवा संरक्षण भिंत उभारावी, तसेच परिसराचे सौंदर्यीकरण करावे, अशी मागणी विर पत्नी श्रीमती सुषमा राजपूत, विर माता जिजाबाई दीक्षित यांच्यासह माजी नगराध्यक्ष आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे.
मुख्याधिकारी, नगर परिषद यांना दिलेल्या निवेदनात संरक्षण भिंतीसह इतर विकासात्मक कामे करण्याची विनंती करण्यात आली आहे. निवेदनावर श्रीमती सुषमा राजपूत, जिजाबाई दीक्षित, अॅड. हरीश रावळ, हरी गोसावी, विरसिंहदादा राजपूत, डॉ. आर. एस. पाटील संजय सुलताने, मनोज सुलताने, बजरंगसिंह राजपूत, सुधाकर तायडे, गोपाल जावरे, डॉ.अमोल गोठी, विकास धांडे पेंटर, क्रिष्णा दिक्षीत, दिपाली राजपूत, मनिषा राजपूत, शुभम राजपूत यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. या मागणीमुळे शहीद संजयसिंह राजपूत यांच्या स्मारकाच्या सुरक्षेसाठी प्रशासन तत्काळ पावले उचलेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.